जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून काल मंगळवारी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचं वातावरण झाल्यानं थंडी ओसरली असल्याचं चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आगामी तीन दिवस जळगाव शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.

डिसेंबर महिन्यात थंडी अधिक प्रमाणात होती. मात्र, जानेवारी महिन्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी गारठा तर कधी ढगाळ वातावरण व पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. मंगळवारी सकाळपासूनच जळगाव मध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हंगामातील हातातोंडाशी आलेले मका, गहू, ज्वारी, केळी ही पिके आडवी पडली आहेत, तर दुसरीकडे लिंबू व आंब्यांच्या फुटव्याला बाधा आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट अद्याप कायम आहे. जिल्ह्यात अजून काही तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. यासह ३१ जानेवारीपर्यंत सायंकाळदरम्यान पावसाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे काही प्रमाणात थंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.







