⁠ 
रविवार, मे 19, 2024

श्रावण पावला ! विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र राज्यासह जळगावात गेल्या जवळपास १५ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागली आहेत. विश्रांतीनंतर राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील सकाळपासून रिमझीम पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जळगावला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे राज्यात पावसाचा पुन्हा पावसाचे कमबॅक झाले आहे. गेल्या १५ दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली.यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, राज्यातील काही भागात काल गुरुवारपासून पाऊस पडताना दिसत आहे. 

जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु होता. पावसाने विश्रांती घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यासोबतच खरिपाची पिकं करपायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र आज सकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यांनतर दुपारपासून जिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरु आहे. यामुळे पिकांना मोठा आधार मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्याला आज शुक्रवारी आणि उद्या शनिवार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेती पिकांना पावसाची गरज होती. ज्वारी, कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांमध्ये उद्या म्हणजेच १९ ऑगस्टपासून पाऊस जोर धरणार आहे. शिवाय ठाणे, कोकण आणि मुंबईसह नवी मुंबई भागातमध्ये देखील पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असणार आहे.