⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावकरांचे आमच्यावर व आमचे जळगावकरांवर विशेष प्रेम – आमदार सत्यजीत तांबे

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२३ । नाशिक पदवीधर मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे आपल्याला समर्थन दिलेल्या सर्व संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी यांची आभार दौऱ्याच्या माध्यमातून भेट घेत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर आपण मागील १५ वर्षे विश्वास दाखवला. त्यांच्याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत जळगावकरांनी मला भरभरून प्रेम दिले. यामुळे जळगावकरांचे आमच्यावर व आमचे जळगावकरांवर विशेष प्रेम आहे. अशा शब्दात आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला आमदार सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा सातत्याने सुरूच आहे. याच आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी शनिवारी बोदवड व मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह येथे डॉक्टर्स असोसिएशन, शैक्षणिक व पदवीधर संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना, आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असून यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावादेखील सुरु असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून जळगाव शहरात युवा माहिती केंद्रांची स्थापना होणार आहे. त्यासाठी तांबे यांनी एक कोटी व अमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर परिसर सुशोभिकरण करण्यासाठी २० लक्ष इतका निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील तब्बल ५५ शाळांना प्रत्येकी एक संगणकाचे वाटप सत्यजीत तांबे यांनी आपल्या आमदार निधीतून केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ०५ जिल्हे ५४ तालुके व ४००० गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने ते संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यापासून मुंबई व संगमनेरचा मुक्काम सोडला तर दररोज सरासरी ५००- ६०० किमी इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी मतदारसंघात दिसणे तसे फार दुर्मिळ असते. लोकप्रतिनिधींकडे काही काम असेल तर तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात मतदारांना चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना मोठमोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असतो. मात्र याला अपवाद ठरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचा हा आभार दौरा इतर सर्व लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल.