जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२६ । जळगावसह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असून ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांचे नाकीनऊ आले आहेत.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात दोन दिवसाच्या गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर काल शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यावरचे पावसाचे संकट अद्याप टळलेले नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज ४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक गेले. केळी पिकांसह इतर पिकांचे मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे अवकाळीमुळे जळगावचा पारा घसरला आहे.
सततच्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून कमाल तापमानात सुमारे ६ ते ७ अंशांची घसरण होऊन ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सकाळच्या वेळेत हवेत थंडावा जाणवत असल्याने नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज शनिवारी देखील हवामान खात्यानं जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तर भारतातून थंड हवा व ओलावा घेऊन येणारा पश्चिमी विक्षोभ अद्याप सक्रिय असल्याने वातावरणात हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यातील तापलेली जमीन आणि अरबी समुद्रातून येणारा ओलावा यांचा मेळ बसल्यामुळे विजांचा कडकडाट, वेगवान वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.







