⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय, महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का? अजित पवारांनी केलं ‘हे’ महत्त्वाचं वक्तव्य

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारनं तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काही दिवसापासून दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्स शी बोलून निर्णय घेऊ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निर्बंधांसंबधी भाष्य केलं.

करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानी मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पुन्हा मास्क वापरण्यासाठी सांगायचं की नाही यावरही चर्चा झाली. सद्यपरिस्थिती पाहता लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं असल्याचं ते म्हणालेत.

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेऊ असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचंही ते म्हणालेत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचे संकट कमी झालं असलं तरी अजून ते संपलं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.