जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत राज्यातील चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून आता थेट ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

४,८१६ कोटी रुपयांचे ‘हमीभाव’ कवच
केंद्र सरकारच्या या वाढीव खरेदी मर्यादेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत (MSP) सुरक्षा मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य आणि हमीभाव मिळण्याची पूर्ण शाश्वती या निर्णयामुळे मिळाली आहे.

खरेदीची मुदत वाढवली
खरेदीची मर्यादा वाढवण्यासोबतच केंद्र सरकारने हरभरा खरेदीची अंतिम मुदत आता २९ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे जे शेतकरी काही कारणास्तव किंवा वेळेअभावी आतापर्यंत आपला माल शासकीय खरेदी केंद्रांवर विकू शकले नव्हते, त्यांनाही या वाढीव मुदतीचा आणि आधारभूत किंमतीचा (हमीभावाचा) लाभ घेता येणार आहे.
बाजारपेठेत हरभऱ्याचे भाव कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आणि विशेषतः विदर्भ-मराठवाड्यातील हरभरा उत्पादक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.









