जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । यंदा मान्सून साधारपणे १२ ते १४ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून दाखल झाल्यामुळे सर्वच भागात पेरणीसाठी तयारी चालू आहे. दरम्यान, काही दिवसांची विश्रांती घेऊन आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून आगामी पाच दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार पुढच्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामानाचा ताजा अंदाज काय?
मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसांत दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईच्या हवामान विभागाने 1 ते 5 जून या पाच दिवसांसाठी हवामानाचं अंदाज व्यक्त केला होता. याच अंदाजानुसार राज्यात मुंबई, ठाणे तसेच कोणणातील काही जिल्ह्यांत ढग जमा झालेले दिसत आहेत. त्यामुळे आगामी तीन दिवसांत या भागात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातही गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण होते. मात्र मागच्या तीन चार दिवसापासून सूर्य तापू लागला असून उकाडा जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात ४ आणि ५ जून रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.