जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । यंदा नियोजित वेळेपेक्षा ८ दिवस आधीच मान्सून देशात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात देखील मान्सूनने धमाकेदार एंट्री घेत अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. सध्या पावसाने ब्रेक घेतला असला तरी आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम आसपासच्या राज्यांवर होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी केरळसह, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे -कुठे पावसाचा इशारा?
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.