जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । महाराष्ट्रातील मुंबईसह काही ठिकाणी धुवाधार पाऊस सुरु असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात सततच्या मुसळधार पावसामुळे नवीन हवामान इशारे जारी केले आहेत. आगामी चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार IMD ने आज मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आजपासून चार दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार वारे (४०-
५० किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता असून जळगावकरांनी काळजी घ्यावी.

सध्या मुंबईसह उपनगरात पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हवामान खात्यानं मुंबईसाठी उद्या, मंगळवारी सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेचे असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाचा जोर पुढील ४८ तास कायम राहण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने पूरपरिस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात सततच्या मुसळधार पावसामुळे नवीन हवामान इशारे जारी केले आहेत.
राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस ≥ २०४.५ मिमी): मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट क्षेत्र), सातारा (घाट क्षेत्र)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अति मुसळधार पाऊस ११५.६–२०४.४ मिमी): सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे (शहरी भाग), कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव
यलो अलर्ट (मुसळधार पाऊस ६४.५–११५.५ मिमी): पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेडसह उर्वरित जिल्हे












