जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) इतिहासात पहिल्यांदा घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला असून यामुळे राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. सोबतच दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे. महावितरणमधील सूत्रांनी ही माहिती दिली. येत्या एप्रिलपासून याची कार्यवाही होण्याचे संकेत असून त्यामुळे वीज दरात प्रतियुनिट 80 पैसे ते एक रुपयापर्यंत कपात होऊ शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच सौर ऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वीज दर कपातीचे तपशील
महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, 2025-26 ते 2029-30 या कालावधीमध्ये वीज दरात 12 टक्के ते 23 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. 100 यूनिट पेक्षा कमी वीज वापरणारे घरगुती ग्राहकांना सध्या प्रति युनिट 5.14 रुपये द्यावे लागतात, ते 2029-30 मध्ये 2.20 रुपये पर्यंत कमी होणार आहेत. 101 ते 300 यूनिट वीज वापरणारे ग्राहकांना सध्या प्रति युनिट 11.06 रुपये द्यावे लागतात, ते 2030 मध्ये 9.30 रुपये पर्यंत कमी होणार आहेत.
कोणत्या वेळी वीज वापरली, त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत टीओडी (टाईम ऑफ डे) म्हणतात. ही सुविधा आतापर्यंत केवळ उद्योगांना होती. आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे. घरगुती ग्राहकांकडे सध्या बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. तथापि घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत.