जळगाव लाईव्ह न्यूज : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून हवामान विभागाने आज (५ सप्टेंबर) रोजी अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) विशेषतः कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. आज (ता. ५) कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

गुरुवारी सकाळपासून राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच होता. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
पुणे, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताराला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत वादळ-विजांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, तर नंदुरबार व नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.








