⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हतनूरचे चार दरवाजे उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ ।  विदर्भ आणि मध्य प्रदेशात होत असलेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजेला धरणाचे चार दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात ४ हजार ६९६ क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

मागील गेल्या दीड महिन्यापासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने सातत्याने धरणाची पातळी वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. 

त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर पसरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात भरीव वाढ झाल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो.