⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

सामनामधील टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी ; गुलाबराव पाटलांची सडकून टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचं खाते वाटप झालं. त्यात मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले शिंदे गटातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना पूर्वीचंच पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. दरम्यान, ”भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली”, असं टिकास्त्र शिवसेनेचा मुखपत्र असलेला सामना अग्रलेखातून शिंदे गटावर डागण्यात आलं.

त्यावरून आता राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे. सामनातून (Saamana) झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. .“खातं कुणाला कोणतं आलं, त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचं खाते वाटप झालं. माझं पूर्वीचंच पाणीपुरवठा खातं मला मिळालं. त्यामुळे आनंद झाला आहे. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्यानं जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पुरवण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद आहे, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.