⁠ 
सोमवार, मे 20, 2024

आनंदात पार पडलेल्या लग्नमंडपात पसरली शोककळा ; जळगावात घडली दुर्दैवी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । लग्न म्हटलं कि घरात आनंदाचा मोहल असतो. मात्र, जळगावात घडलेल्या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली. लग्न मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी अंडरग्राउंड सेप्टी टँकमध्ये पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील उस्मानिया पार्कमध्ये घडली. तस्मिरा परवेझ सय्यद असं या मृत बालिकेचे नाव आहे. नवरीची विदाई होण्यापूर्वीच ही घटना घडल्यामुळे आनंद व उत्साहात पार पडलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली होती.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबरला राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी मुक्तार सय्यद यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आले होते. यांच्यात निजामपूर (ता. साक्री) येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात ड्युप्लेक्स स्किम अंतर्गत मागूनपुढून आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.

गल्लीतच मंडप टाकण्यात आला होता. मंडपाजवळच चार ड्युप्लेक्स बंगलोचे बांधकाम सुरू असून प्रत्येक घरात स्वतंत्र सेप्टिक टँक बांधले आहे. बांधकामासाठी लागणारे पाणी याच या टाक्यांमधून घेतले जात असल्याने त्या पाण्याने भरलेल्या होत्या. सर्वच लहान मुले बांधकामाच्य ठिकाणी, वाळूवर खेळत असल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले. स्लॅबचे काम सुरू असल्याने त्यांनी लहानग्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना भरलेला सेप्टीटँक दिसला. त्यांनी एकेक करून चारही घरातील टँक पाट्यांनी झाकण्यास सुरवात केली. चौथ्या टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने कुणाची बाहुली टाकीत पडली म्हणून डोकावले असता त्यात मृत बालिका आढळली. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला.

बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवून गुजराण करतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह कुटुंबातील इतर लोक जळगावला आले होते. मात्र, ते आले नव्हते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या अक्रोशने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.