⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

गिरीश महाजनांचे उध्दव ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले बालिश, अस्वस्थ…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ सप्टेंबर २०२३ | उध्दव ठाकरे यांची जळगावमध्ये नुकतीच सभा पार पडली. या सभेत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत, असा चिमटाही महाजन यांनी यावेळी काढला.

नाशिक येथे बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले असून त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत. तसेच मनात येईल ते बोलत सुटलेत. का उद्धव ठाकरे यांच्याच मनात काही काळेभेर नाही ना? हे तपासून बघितलं पाहिजे. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. खरं तर उद्धव ठाकरे यांचीच चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली आहे. पोलिसांनी यांनाच ताब्यात घेऊन जाब विचारला पाहिजे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहे, त्यांच्या मागे कोणी राहिलं नाही, म्हणून ते अस्वस्थ असून आम्हाला त्यांचं शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहे, म्हणून त्यांना बोलावं लागतं, पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे? शिवाय मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? असे अनेक प्रश्न महाजन यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर उपस्थित केले.

महाजन म्हणाले की, 25 वर्षे यांनी काय, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का? तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाही. 90 टक्के शिवसेना आमच्यासोबत आहे, त्यामुळे ते काय बोलत आहे, काही कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं, त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर, हा असा दिसतो, तो तसा दिसतो, आम्हीही बोलू शकतो. पण मर्यादा सोडत नसल्याचे महाजन म्हणाले. 48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राम मंदिरसाठी देशभरातून माणसे बोलवतील आणि परत जाताना गोध्रा घडवतील. जाळपोळ करतील, त्यावर आपली पोळी भाजतील. निवडणूक आल्यावर घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यांच्या ते पोळ्या भाजतील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.