⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

४० दिवसाच्या मृत्यूशी झुंज अपयशी, गारखेडा-जामनेर अपघातातील जखमीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । आयशरने पॅजो रिक्षाला दिलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात २१ डिसेंबरला गारखेडा-जामनेर मार्गावर घडली होती. तर पूनमचंद किसन भोई (वय ५६, रा.कुऱ्हे पानाचे) हे गंभीर जखमी झाले होते. अखेर ४० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२८) सकाळी ८.३० वाजता त्यांचीही प्राणज्योत मावळली. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या पाच झाली आहे.

काय आहे घटना?
गारखेडा-जामनेर मार्गावर २१ डिसेंबर २०२१ रोजी लाकूड वाहतूक करणाऱ्या आयशरने पॅजो रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर चौघांची प्रकृती गंभीर होती. जखमींपैकी कुऱ्हे पानाचे येथील रिक्षाचालक सागर समाधान टोंगळे (वय २२) याचा २६ डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर २८ जानेवारीला सकाळी ८:३० वाजता पूनमचंद भोई यांचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

अपघातात त्यांच्या अंगावर लाकडे पडल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराला दुखापत झाली होती. हाता पायात रॉड टाकलेले होते. त्यामुळे त्यांना जागेवरून हालचाल करणे अशक्य झाले होते. अखेर अपघाताच्या ४०व्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. पूनमचंद भोई यांच्या निधनामुळे कुऱ्हे पानाचे गावावर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा :