रावेर परिसरात शेतकऱ्यांना मिळू शकतो तुरीचा आधार

नोव्हेंबर 12, 2021 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । तामसवाडी ( ता.रावेर ) परिसरात कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तुर या डळवर्गीय पिकाचा बर्‍यापैकी आधार मिळण्याची शक्‍यता आहे.

raver jpg webp

सविस्तर असे की, तामसवाडी परिसरात अतिवृष्टीसारख्या आस्मानी संकटामुळे कापुस, सोयाबीन, उडीद, मूग, मका,ज्वारी अशा सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले आहे. एक प्रकारे आर्थिक आणीबाणी सदृश दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला बांधावर लावलेल्या तुरींनी आधार दिला कंबरडे मोडलेले असतांना शेतमजुरही रोजगारा आभावी भरडला गेला आहे. तुरींनी बहर घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वर्षी परतीच्या पावसामुळे देखील अनेक पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच भर म्हणजे या वर्षी रब्बी पीके देखील संकटात येतात की काय ? या प्रश्नाने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडलेला असतांना केलेली तुरीची लागवड कामी आली आहे. खरिपाची पिके हातून गेलेली असतांना ही रब्बी हंगामात या वर्षी थंडी चांगली असल्याने खरीप हंगामात लागवड केलेली तूर चांगली बहरली आहे. तुरीला बहर आल्याने शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून, तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. भरड धान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति सुधारून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. या पिकाला कमी खत लागते. त्याच प्रमाणे इतर पिकांच्या तुलनेने कमी रोग पडतात.

आंतरपीक म्हणून, ठरते फायदयाची 

तूर शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. भारतामध्ये तसे इतर देशांमध्येही तुरीचे उत्पादन घेतले जाते तरी तुरीचे पीक हे भारतामध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून याची ओळख आहे. तुरीचे पीक बहुतांश शेतकरी घेतात तसेच महाराष्ट्रामध्ये ६० ते ७० टक्के आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. तुरीचे पिकापासून तुरीची डाळ तसेच बेसन तसेच विविध प्रकारे तुरिचा वापर केला जातो. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तुरीची डाळीचा आहार रोजच्या जेवणामध्ये वापर केल्या जातो तसेच तुरीला हमी भाव मिळण्याची शक्यताच असते म्हणून बहुतांश शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात खान्देशमधील जळगाव जिल्ह्यातील लोकं तुर व तूर डाळ यापासून बनवलेल्या अन्नपदार्थांना विशेष महत्व देतात.

तुरीपासून बनवलेली ऊसळ, खिचडी, ओल्या तुर दाण्या पासून बनवलेली हिरवी , लाल मिरच्यांची खमंग भाजी, तुरीच्या डाळीपासून फुणके( भेंडके), डाळ घालून केलेली डाळ गंडोरी, खान्देशी तूर डाळ घालून केलेल्या विविध भाज्या, आमटी, खान्देशी तिखट डाळ फ्राय, खान्देशी तुर डाळ पासून बनवलेले वरण बट्टी हे खान्देश विशेश करून जळगांव जिल्ह्य़ातील प्रसिद्ध जेवण आहे. खरीप पिकाचा शेवटचा हंगाम म्हणजे तुर सध्या हवामानानुसार तूर पिकाचा हंगाम तेजीत असून, कौशल्यपूर्ण मशागत व पेरणीचे चांगले नियोजन यामुळे पिवळ्या धम्म बहारदार फुलांची आरास पाहायला मिळत आहे. काळी कसदार सुपीक जमीन मनसोक्त झालेला परतीचा पाऊस तुर पिकाला पोषक ठरला आहे. त्यामुळेआस्मानी संकटाने कंबरडेच मोडलेल्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना तुर या डाळवर्गीय पिकाचा बर्‍यापैकी आधार मिळू शकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now