⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पाचोऱ्याच्या गुरुजींचे भविष्य ठरले खरे, शिंदेंच्या नशिबात आला राजयोग!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Pachora) यांनी काही महिन्यांपूर्वी गुप्तता पाळत पाचोरा दौरा केला होता. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेत पाचोर्‍यातील गजानन जोशी गुरुजींना एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा हात दाखवला होता. एकनाथ शिंदे यांनी भविष्य जाणून घेतले असता नशिबात राजयोग असल्याचे भविष्य जोशी गुरुजींनी व्यक्त केल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने गेल्या आठवड्यात जोशी गुरुजी यांची मुलाखत घेतली असता त्यांनी राजयोगचा पुनरुच्चार केला आणि तीन जुलैपर्यंत मोठी घडामोड घडणार असे भाकीत देखील वाचविले होते. जोशी गुरुजींनी सांगितलेला शब्द न शब्द खरा ठरला असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत.

हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की.. असे शब्द ऐकून गुरुवारी अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांना तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यावर विश्वासच बसत नव्हता. अवघ्या काही तासाअगोदर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असे चित्र असताना राज्यपालांच्या भेटीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. स्वतः मंत्रिमंडळ बाहेर राहणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र काही तासातच वरिष्ठांच्या आदेशाने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यात अवघ्या दोन तासात घडलेल्या या घडामोडींनी अनेकांची झोप उडाली, कितीतरी जणांचे अंदाज खोटे ठरले. तर्कवितर्क तर बाजूलाच पडले.
हे देखील वाचा : भाजपचा मास्टर स्ट्रोक : धर्मवीरांचे एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्यात राज्यसभा निवडणुकीत भाजपने धक्कातंत्र वापरून मविआच्या उमेदवाराचा पराभव केला होता. राज्यसभा निवडणुकीतून मविआ धडा घेणार आणि विधान परिषदेत चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. सर्व नियोजनबद्ध असताना देखील भाजपची खेळी यशस्वी झाली आणि मविआच्या उमेदवाराचा पुन्हा पराभव झाला. विधान परिषद निवडणूक आटोपतच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रीचेबल झाले. दि.२० जूनपासून सुरू झालेले हे महाराष्ट्रातील महा राजकीय नाट्य दि.३० रोजी संपुष्टात आले. संपूर्ण घडामोडीत शिंदे गटाचे काय होणार? कसे होणार? मुख्यमंत्री कोण? भाजप कुठे असणार? याचे केवळ तर्कवितर्क बांधले जात होते मात्र एकच व्यक्ती अशी होती जी एकनाथ शिंदे यांच्या नशिबात राजयोग असून तेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होते. ती व्यक्ती म्हणजे पाचोरा येथील रामचंद्र मंदिराचे गुरुजी गजानन जोशी महाराज.

ऑक्टोबर महिन्यात एकनाथ शिंदे अचानक पाचोरा आले होते. शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन देखील अनभिज्ञ होते. पाचोरा-भडगाव येथील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात असले तरी या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पाचोऱ्यातील श्रीराम मंदिराला भेट देत एकनाथ शिंदे यांनी पूजा विधी देखील केला होता. शिंदे यांच्यासोबत तेव्हा आ.किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, तत्कालीन नगराध्यक्ष संजय गोहिल हेच होते. शिंदे केव्हा आले आणि केव्हा रवाना झाले हे अनेकांना कळले देखील नसले तरी एकनाथ शिंदे यांनी गजानन जोशी गुरुजींना आपला हात दाखवीत भविष्य जाणून घेतले होते हे मात्र निश्चित. एकनाथ शिंदे यांच्या नशिबात लवकरच राजयोग असल्याचे संकेत जोशी गुरुजींनी दिले होते.

विधान परिषद निवडणूक आटोपल्यावर एकनाथ शिंदे गट नॉट रीचेबल होताच राज्यात खळबळ उडाली. ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने थेट पाचोरा धडक देत श्रीराम मंदिरातून गजानन जोशी गुरुजींकडून एकनाथ शिंदे व सरकारबाबत मत जाणून घेतले. ग्रहांची सध्याची परिस्थिती लक्षात घेता लवकरच मोठी घडामोड घडणार असून ४ जुलैपर्यंत चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड यशस्वी होऊन त्यांच्या नशिबात राजयोग असल्याने तेच मुख्यमंत्री होणार असे संकेत देखील जोशी गुरुजींनी दिले होते. राज्यातील चित्र दि.३० रोजी स्पष्ट झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. पाचोरा येथील गजानन जोशी गुरुजींनी वर्तविलेले भविष्य खरे ठरले आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात व्हायरल होत असलेला पंचांगचा एक कागद आणि जोशी गुरुजींनी व्यक्त केलेले भविष्य यामुळे ज्योतिषशास्त्रावरील विश्वास अधिक दृढ होईल हे निश्चित.