भाजपचा मास्टर स्ट्रोक : धर्मवीरांचे एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

जून 30, 2022 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले असून तेच मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रीमंडळाबाहेर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज सायंकाळीच ७.३० वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde

मुंबईत राज्यपाल भवनात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करीत भाजपने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला असून या खेळीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस म्हणाले कि, भाजप-सेना युतीची नागरिकांना अपेक्षा होती. युतीचे १७० लोक निवडून आले होते. शिवसेनेने बहुमताचा अपमान करीत भाजपला बाहेर ठेवले. मविआ सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. इतिहासात पहिल्यांदा दोन मंत्र्यांना कारागृहात जावे लागले. बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला. दाऊदशी संबंध असलेले मंत्री मंडळात होते, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : कोण आहेत ‘आनंद दिघें’चे निष्ठावंत मानले जाणारे एकनाथ शिंदे?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या या आमदारांची सरकारमध्ये कुचंबणा होत होती. आमच्या मतदारसंघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचे, असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची, ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Congress NCP) नेत्यांना अधिक प्राधान्य दिले, अशी टीका त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडले तर आम्ही पर्यायी सरकार देऊ. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, असे मी वारंवार सांगत होतो, असे फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, मी कोणतीही अपेक्षा केलेली नव्हती. फडणवीसांनी बाळासाहेबांच्या सैनिकाला पाठिंबा दिला. भाजप मोठा पक्ष असताना देखील मला त्यांनी संधी दिली. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात नसले तरी राज्याच्या विकासासाठी ते आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फडणवीसांइतका मोठ्या मनाचा माणूस असू शकत नाही. एकीकडे खूप मोठे मोठे नेते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे सारखा लहानसा कार्यकर्ता आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आम्हाला शिकवण आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य या ५० आमदारांनी केले आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
हे देखील वाचा : Big Breaking : फडणवीस सरकारच्या मंत्रिपदाची यादी ‘लीक’?, वाचा कुणाला मिळणार संधी!

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपा आणि 16 अपक्ष आमदार एकत्र आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. मुखमंत्रीपदासाठी आम्ही चालत नाही. ही तत्वाची लढाई आहे. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई आहे. शिंदेंना भाजपा पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे या आमदारांनी आपला आवाज बुलंद केला. मी त्याला बंड म्हणणार नाही. हे अंतर्विरोधाने भरलेले सरकार आहे. असे सरकार दीर्घकाळ चालणार नाही हे मी सांगत होतो, असा हल्लाबोल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/572731747796765

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now