⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; कारण…

जळगाव लाईव्ह न्यूज : २५ मार्च २०२३ : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या निर्णयाचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर पहायला मिळणार आहे. एखाद्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी लागू केला जातो? आता जळगाव जिल्ह्यात हा कायदा का लागू करण्यात आला आहे? या कायद्यामुळे प्रशासनाला कोणते अधिकार मिळतात? आदि प्रश्‍नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्च महिना संपत आला असून सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळा अद्यापही बसलेल्या नाहीत. मात्र एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढून जळगावकरांना उन्हाच्या झळा बसू शकतात, असा अंदाज आहे. संभाव्य तापमान वाढीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत विविध विभागांतील अधिकार्‍यांसह तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

नैसर्गिक आपत्तीत जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी विभागनिहाय जबाबदारीही वाटप करण्यात आली आहे. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या वेळा बदलून शक्यतो त्या सकाळ सत्रातच भरावाव्यात आणि प्रत्येक रुग्णालयात उष्माघात प्रतिबंध कक्ष कार्यान्वीत करावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकार्‍यांना मिळणारे अधिकार

आवश्यकता भासल्यास खासगी जागा, वाहने, सेवा, वस्तू अधिग्रहित करणे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारा निधी उभा करणे.
आपत्ती बाबत अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करणे.
आपत्ती व्यवस्थापनसाठी लागणारी मानवी संसाधन उभारणे.
आत्यवशक वस्तूंची साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करणे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकार्‍यांवरील जबाबदारी

आपत्ती बाबत जनजागृती करणे
आपत्ती बाबत गोंधळाची निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहणे.
आपत्तकालिन मदत आणि सेवा लोकांपर्यंत पोहचवणे.
आपत्ती निवारणासाठी धोरण आखणे आणि अंमलबजावणी करणे.