जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । विधानसभा निवडणुकीत भाजप नेते दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असून ते सातत्याने भाजपवर (BJP) विविध आरोप करत आहे. यातच आता मुंबईत गुढीपाडव्याच्या मेळावादरम्यान दिनकर पाटील यांनी भाजपचे नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना थेट आव्हान दिले आहे.

काय म्हणाले दिनकर पाटील?
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात ते म्हणाले, आमच्याकडे एक संकटमोचक आहेत. सगळेच त्यांना घाबरतात. मात्र मी त्यांना घाबरत नाही. त्यांना पुरून उरेल. कारण आता महापालिकेत भाजप नवे तर मनसेची सत्ता येणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहराचा विकास करू.
ते म्हणाले, मी गेली ४५ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. ३४ वर्ष काँग्रेस पक्षात होतो. अकरा वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले. मात्र भारतीय जनता पक्षाने मला काहीही दिले नाही. हा पक्ष प्रत्येकाला फसवतो. भाजप हा लबाड पक्ष आहे. कोणीही त्या पक्षात जाऊ नये.
भारतीय जनता पक्ष फक्त आपले मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्यांच्या बगलबच्चांचे हित साधत असतो. त्यांनी आतापर्यंत कोणालाही काहीही दिले नाही. जाती-जातीत आणि व्यक्ती व्यक्तीत भांडणे लावून आणि राज्यात दंगली घडवून ते राज्य करीत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक मतदान यंत्र मॅनेज करून निवडणूक जिंकल्याचा आरोप, पाटील यांनी केला.