जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । रावेर शहरातील उटखेडा रोडवरील सबस्टेशनमधून वस्तीतून गेलेल्या 11 के.व्ही. तामसवाडी फिडरची उच्च दाबाची वीज वाहिनी हटविण्याची मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. यामुळे दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

शहरालगत असलेल्या अष्टविनायकनगरमधील गट क्रमांक 1146 व या परीसरातील कॉलनी मधून ही वीज वाहिनी गेली आहे. पूर्वी हा भाग शेतीच्या वापरासाठी होता परंतु शहराचा विस्तार वाढत जाऊन 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी कॉलन्या अस्तित्वात येऊन तेव्हापासून हा संपूर्ण भाग रहिवासी प्रयोजनार्थ झालेला आहे मात्र रहिवासी वस्त्यांमधून गेलेल्या तामसवाडी फिडर उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अष्टविनायक नगर व परीसरात राहणार्या रहिवाशांच्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.
गतकाळात या वीज वाहिनीमुळे विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती तर 2018 मध्ये याच वीज वाहिनीच्या तारा तुटून एक रहिवाशी महिला व बांधकाम करणारे 4 ते 5 मजूर थोडक्यात बचावले होते. अशा घटना या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेक वेळा घडलेल्या असून भविष्यात तामसवाडी फिडरवर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची व त्यात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या फिडरवर वारंवार घडणार्या घटना व रहिवाशी वस्तीचा विचार करून तामसवाडी फिडरची उच्च दाबाची वीज वहिनी अष्टविनायक नगर व परिसरातून त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.