जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क (Import Duty) हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा थेट आणि विपरित परिणाम आता देशांतर्गत बाजारपेठेवर दिसून येत असून, गेल्या काही दिवसांत कापसाच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे ५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारातील माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी कापसाला ८ हजार २०० ते ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत होता. मात्र, आयात शुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर दर घसरून ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांपर्यंत आले आहेत.

सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस विकून टाकला असल्याने त्यांच्या हातात मोठा साठा शिल्लक नाही. त्यामुळे दरघसरणीचा तातडीचा आर्थिक फटका अनेक शेतकऱ्यांना बसलेला नसला, तरी नव्या हंगामात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क हटविल्यामुळे परदेशातून स्वस्त कापूस भारतीय बाजारात येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आगामी हंगामात देशांतर्गत कापसाच्या दरांवर दबाव राहू शकतो. याचा थेट परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाला चांगली मागणी असल्याने भविष्यात दरांना काही प्रमाणात आधार मिळू शकतो, असा आशावाद व्यापारी आणि बाजार अभ्यासक व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि सरकारच्या पुढील धोरणांवर आगामी काळातील कापसाचे दर अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.








