⁠ 
सोमवार, मे 6, 2024

चितोड्यातील खून प्रकरणातील चौथ्या संशयिताच्या आवळल्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । यावल तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) यांच्या खून प्रकरणातील फरार चौथ्या संशयित आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्यासह आधी अटकेत असलेल्या महिलेसह तिघांना २९ ऑगस्ट रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
चितोडा येथील मनोज भंगाळे याला २१ ऑगस्टच्या रात्री उसनवारीचे घेतलेले ४ लाख रूपये घेण्यासाठी कठोर फाट्याजवळ बोलाविण्यात आले. यावेळी मनोज याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा), देवानंद बाळू कोळी (मूळ रा.यावल, ह.मु. चितोडा) व मितेश उर्फ विघ्नेश भरतसिंग बारेला अटक करण्यात आली होती. या तिघांना २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर या प्रकरणातील चौथा संशयित आरोपी जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक हा फरार होता. त्याला देखील पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता २९ ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, भूषण चव्हाण करत आहे.

दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यातील चौथा संशयित जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक याला गुरुवारी न्यायालयात नेण्याआधी आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्याची साडेचार वर्षांची मुलगी त्यास बिलगून ढसाढसा रडत होती. हा प्रसंग पाहून अनेकांना किव करावी की संताप, असा प्रश्न पडला होता.