⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

केंद्र सरकारला शेतकऱ्यांची पडलेली नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । कांदा उत्पादकांच्या समस्येचे मुळ केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या धोरणात आहे.केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नाही. मंत्र्यांनी तर शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. पर्यायी शेतकरी योग्य वेळी त्याचे परिणाम केंद्रातील सरकारला दाखवून देतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन बोराडे यांनी दिला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन बोराडे म्हणाले कि, केंद्र शासनाच्या कांदा निर्यातीबाबतच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे परदेशी बाजारपेठा गमावल्या आहेत. बांगलादेशसमवेत कांदा निर्यातीचा झालेला दोन वर्षाचा करार मोदी सरकारने मोडीत काढला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेची थट्टा केल्याची टीका त्यांनी केली. घामाचे दाम मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका ठेवा, असे त्यांनी नमूद केले.

कांदा या परिसरातील प्रमुख पिक आहे. सध्याचा कांदा साठवताही येत नाही आणि भाव नसल्याने विकताही येत नाही. त्यातून कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकरी उद्विग्न झाल्याचे चित्र आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही शेतमालाला अपेक्षित दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नसल्याने आर्थिक समीकरणे कोलमडून गेली आहेत.