⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अमळनेरात मंत्री अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याचे दहन

खा.सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संतप्त मोर्चा काढुन केली घोषणाबाजी

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । शिंदे सरकार मधील कॅबिनेट मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरुन बेताल वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढुन महाराणा प्रताप चौकात सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले.

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी कार्यकर्ते पेटुन उठले असतांना अमळनेरात देखील आ. अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. आमदार निवासस्थानापासुन सायंकाळी ६ वा. मोर्चा काढण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तार हाय हाय, महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांचा राजीनामा घ्या, या अब्दुल सत्तारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय, सत्तेचे लालची सत्तारांचा धिक्कार असो, निमका पत्ता कडवा है.. मुर्दाबाद, मुर्दाबाद अश्या अनेक प्रकारच्या घोषणा महिला देत होत्या. सदर मोर्चा महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर त्याठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करुन अब्दुल सत्तारांच्या पुतळ्यास महिलांनी जोडे मारले. यानंतर संतप्त भावनेत या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सदर आंदोलनात मार्केटच्या मुख्य प्रशासक सौ. तिलोत्तमा रविंद्र पाटील, जि.प.सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील, ग्रंथालय सेलच्या सौ. रिता बाविस्कर, प्रदेश पदाधिकारी रंजना देशमुख, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, शहराध्यक्ष अलका पवार, आशा चावरिया, योजना पाटील तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, प्रा. अशोक पवार, एल.टी. पाटील, राजेश शिवाजीराव पाटील, अनिल आबा शिसोदे, भैयासाहेब पाटील, नरहरी पाटील, रणजित भिमसिंग पाटील, डॉ. रामु पाटील, संजय शिरोडे, गिरीश सोनजी पाटील, अनिल बोरसे, गौरव पाटील, महेश पाटील, संजय पाटील, पप्पु कलोसे, अरुणभैय्या पाटील, दिपक पाटील, सुनिल शिंपी, भटु पाटील, देविदास देसले, पिंटु राजपुत, विजयसिंग पाटील, संभाजी पाटील, मुन्ना पवार, सचिन बेहेरे, ज्ञानेश्वर पाटील, पंकज पाटील, मिलींद पाटील, महारु पाटील, विनोद पाटील, निनाद शिसोदे, आकाश मनोरे, कृष्णा पाटील, सनी गायकवाड, शिरीष पाटील, भैयासाहेब सूर्यवंशी, संजय कापडे, विलास पाटील, प्रकाश पाटील, भगवान पाटील, सुनिल पवार, डॉ.रामकृष्ण पाटील, दिपक पाटील, राजेश पाटील, अशोक पवार सर, विजय राजपूत, संजय पाटील, रणजित पाटील, चेतना पाटील, पप्पु कलोसे, वैशाली ससाणे, रंजना देशमुख, रिता बाविस्कर, आशा शिंदे, भावना देसले, आबिद मिस्तरी, रफिक शेख, मुशीर शेख, निलेश देशमुख, प्रदीप पाटील, जयवंत पाटील, उमेश सोनार, दर्पण वाघ, शुभम बोरसे, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, बाबा शेख, वसीम पठाण आदी यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकाराचा संपुर्ण जगात निषेध- आ.अनिल भाईदास पाटील
यावेळी आ.अनिल भाईदास पाटील पत्रकारांशी वार्तालाप करतांना म्हणाले की, सरड्यासारखे रंग बदलणारे हे अब्दुल सत्तार असुन यांच्या सारखे मंत्री सध्याच्या सरकार मध्ये असल्याने खोटा मुखवटा असणारे हे सरकार आहे. एका महिले बद्दल एका जबाबदार मंत्र्याने असे वक्तव्य करणे अतिशय निंदनीय असुन या प्रकाराचा केवळ राज्यातच नव्हे तर संपुर्ण भारतात व जगात देखील निषेध होत आहे. जोपर्यंत हे सरकार अब्दुल सत्ताराचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत आमचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम सरकारला आम्ही देत असुन राजीनामा न घेतल्यास यापेक्षाही प्रखर आंदोलन केले जाईल. आज या ठिकाणी सत्तारांचा पुतळा जाळुन आमच्या भावना आम्ही व्यक्त केल्या आहेत. याठिकाणी दिवे देखील आमच्या महिला भगिनींनी लावले आहेत. त्याचे कारण असे की, या सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा आणि असे मंत्री त्यांनी त्वरीत बाहेर काढावे हीच आमची अपेक्षा आहे. सत्तारांना केलेल्या बेताल वक्तव्याची दिलगीरी जरी व्यक्त केली असली तरी काहीही बोलायचे आणि माफी मागायची ही आपली संस्कृती नसुन त्यांचा राजीनामाच घेतला पाहीजे या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे आ. अनिल पाटील यांनी सांगितले.