⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मामा-मामीची दलाली अडली, नवरी नवरदेवाला सोडून पळाली

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । पाचोरा शहरात एक गंमतशीर आणि गंभीर घटना घडली आहे. लग्न जुळवून देणाऱ्या पुरुष व महिला दलालांमध्ये दलालीवरूनच हाणामारी झाली. दोघांच्या वादात मात्र दीड लाख घेऊन नवरीने पळ काढला आणि नवरदेवाचा खेळखंडोबा झाला. वादात दलालाची दुचाकी व मोबाईलही महिला दलालाने हिसकावून पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद नव्हती.

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने लग्नाचा मोसम जोरात सुरू आहे. शिरपूर येथील मुलाचे काही दलालांनी नाशिक येथील एका मुलीशी लग्न जुळवून दिले. यासाठी लाखो रुपयांची दलाली घेतली. मुलीस दीड लाख रुपये रोख देण्यात आले. शनिवारी लग्नाची तिथी वेळ निश्चित करण्यात झाली. मात्र, नवरी मेकअपसाठी गेली तर ती परत आलीच नाही. नवरदेव बोहल्यावर वाटच पाहत राहिला.

दीड लाख घेऊनही नवरी न आल्याने पाचोरा शहरातील महिला दलाल आणि कुऱ्हाड बुद्रुक ता.पाचोरा येथील दलाल यांच्यात दुपारी ३ वाजेच्या सुमारास शाब्दीक वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. बघ्यांची एकच गर्दी होत असल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करीत हे भांडण सोडविले.

पुरुष दलालाची दुचाकी, मोबाईल घेऊन पळ
महिला ही मुलाकडील तर पुरुष हा मुलीकडून दलाल होता. वधू मेकअपला गेल्याचे सांगून पळून गेली, असे दलाल महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे दलालास महिलेने इतर साथीदारांकडून मारहाण केली तसेच त्याची मोटारसायकल व मोबाइल रोख रक्कम हिसकावून तेथून पळ काढला. दोघांच्या भांडणात नवरीने पळ काढला आणि नवरोबा मात्र बिचारा तसाच राहिला. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.