⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

निवडणुकीतील विजयानंतर घडला धक्कादायक प्रकार, जळगावात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच मात्र, जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?

जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक होती. भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत रिंगणात होते. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी हा सरपंचपदासाठी उभा होता. यादरम्यान गावातील देवीच्या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी जात असताना यावेळी काही जणांनी अचानक धनराज माळी याच्यावर त्याच्या सोबत असलेल्या इतरांवर दगडफेक केली. तसेच काही जणांनी लाठ्या काठ्यानी हल्ला चढवला. यावेळी डोक्यात दगड लागून दुखापत झाल्याने धनराज माळी हा जखमी झाला होता. या घटनेत जखमी धनराजला जामनेर येथील रुग्णालयात हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

गावातील विजय मिरवणूक सुरू असताना यादरम्यान पराभूत पॅनलचे कार्यकर्ते व विजयी पॅनलचे कार्यकर्ते हे समोर आल्याने झालेल्या हाणामारी व दगड फेकीत यात धनराज माळी याचा मृत्यू झाल्याची ही चर्चा यावेळी सुरू होती.