शेकऱ्यांनो लक्ष द्या : आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

farmer

        जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । खरीप हंगाम 2022 हंगामात जिल्हयात खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. एप्रिल व मे, महिन्यात आवश्यकतेप्रमाणे खत पुरवठा कंपन्यांमार्फत करण्यात आलेला आहे.  युरीया या खताचा 60910 मे. टन साठा विक्री साठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा 6493 मे. टन. एमओपी खताचा 8544 मे. टन एनपीके संयुक्त खतांचा 28690 मे. टन व एसएसपी खताचा 47119 खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

          एकंदरीत माहे मे च्या अखेरीस व खरीप हंगामाच्या सुरुवातीस युरीया सह इतर खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असून दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. तसेच खताच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यस संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करुन ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. शेतकरी बांधवांनी फक्त युरीया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी.

          कृषि निवीष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये म्हणुन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे.  असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव वैभव शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now