जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२५ । एकीकडे मे हीटचा तडाखा एप्रिल महिन्यातच जाणवू लागली आहे. यातच नवती बागांमधील केळी मालाची परिपक्वता वेगात होऊन केळी मालाची आवक कमालीची वाढली. केळी कापणीला आल्यानंतर केळीचे बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धतता वाढली आहे. मात्र उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्याने दि. १ एप्रिलपासून १०० ते २०० रुपयांनी बाजारभाव घसरत आहेत. ब-हाणपूर लिलाव बाजारातील ९९ गाड्यांचा केळी मालाच्या प्रतवारीनुसार झालेल्या लिलावात किमान भाव ६०१ रुपये प्रतिक्विंटल तर कमाल भाव ११०१ रुपये, तर सर्वोत्कृष्ट भाव १३७५ रुपये प्रतिक्विंटल असे घोषित करण्यात आले. तसेच रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी भाव समितीकडून कमाल भाव १७२५ रुपये, तर किमान भाव १५७५ रुपये प्रतिक्विंटल घोषित करण्यात आला आहे.
उन्हाळ्यानंतर होऊ शकते केळीची भाववाढ
बन्हाणपूर बाजार समितीच्या लिलाव बाजारातील केळी भावांवरचं केळी बाजारभावांचे चलचित्र सुरू राहत असल्याचे वास्तव चित्र आहे.
आज बाजारात द्राक्षे, संत्री, मोसंबी आले असल्याने रसाळ फळांकडे ग्राहक वळला आहे. तरीही आंब्याला परिपक्वतेची गोडी व कलिंगड तथा खरबुजांना नदीच्या थडीची गोडी नसल्याने केळीवर फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. किंबहुना ही उष्ण लाट टळल्यानंतर बाजार भाव उंचावण्याची अपेक्षा उंचावल्या आहेत.