⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

बाळासाहेबांच्या पोराने करून दाखवल : औरंगाबाद नाही आता संभाजीनगर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामाकरण संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. खुद्द हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती. आता उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणला जाणार असून तो मंजूर केला जाणार आहे.

औरंगाबादचा नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी कॅबिनेट बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणून उद्याच त्याला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचविली. शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्ष संभाजीनगर करा ही मागणी रेटून धरली होती. गेल्या अडीच वर्षापासून संभाजीनगर आम्ही करणार आहोत असं कित्येकदा सांगूनही उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता राज्यातील परिस्थिती बदलू लागली आहे. लवकरच सत्ता पालट होऊ शकतो हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे कद्दावर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले असून आता ते गुहाटी येथे आहेत. या ठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतर ४० आमदारही आहेत. यामुळे आता राज्यात सत्तापालट होणार यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला असून लवकरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत आणण्यात येणार आहे. तो ठराव मंजूर केला जाणार आहे.