जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजुर उपसा सिंचन योजना यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागायतदांना कळविण्यात येते की, दि.१ मार्च २०२५ ते ३०जून २०२५ या कालावधी करीता दि.१ मार्च २०२५ पासुन सुरु होणारा उन्हाळी हंगाम २०२५ मध्ये भुसार/अन्नधान्य/धारा/डाळी/कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच / ना मंजुरी चा विचार करण्यात येईल.
मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश / पाळी नसतांना पाणी घेणे/ मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/ विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/ व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदना मध्ये नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.
लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठी पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेला आहे. आरक्षित पाणीसाठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागीयव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही एन. एन.व्हट्टे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.