⁠ 
सोमवार, मे 6, 2024

व्हिडीओ : जळगावचा आमदार अतिशय ‘ढ’; शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांची बोचरी टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । शहरातील भाजपच्या मंडळीने पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले. भाजपची ही सर्व मंडळी शोले चित्रपटातील सुरमा भोपाली मंडळी आहे. आ.राजुमामा भोळे यांनी गंमतीशीर मुद्दे मांडले. आमदारांनी पत्रकार परिषदेत ‘गरीब की बीबी सबकी भाभी’ हे उदाहरण दिले त्यांना हे देखील ठाऊक नाही की ही म्हण कुम्हण आहे. आमदारांनी ते उदाहरण देत गरिबांच्या आई, बहीण, पत्नी, स्त्रियांचा अपमान केला आहे. आमदारांना काय बोलावे याचे भान नाही. आ.भोळे अतिशय ‘ढ’ आमदार आहेत, असा टोला शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी यांनी लगावला आहे.

मनपात घेतलेले पत्रकार परिषदेत बंटी जोशी म्हणाले की, भाजपच्या पत्रकार परिषदेत बसलेले भगत बाबा कुठे, कुठे फिरून आले आहेत हे त्यांनी पहावे. तसेच उपस्थित असलेले इतर सदस्य घरकुल घोटाळ्यात आरोपी आहेत ते आमदारांना दिसले नाही का? १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसून तुम्ही काय बोंब पाडली. कोणत्या मजल्यावर बसतो याला महत्व नाही तुमच्या डोक्याच्या वरच्या मजल्यात काय आहे याला महत्व आहे.

१०० कोटी, २५ कोटींचे नियोजन करू शकले नाही. नियोजन शून्य कारभारामुळे निधी परत गेला. भाजपचे नेते नेहमी आकडे फुगवून सांगतात, असा टोला देखील बंटी जोशी यांनी लगावला.

आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

अमृत आणि भूमीगत गटारी योजना केंद्र सरकारची आहे. त्यासाठी काही निर्देश आहे, त्यानुसार जळगावचा समावेश त्यात झाला. योजना जळगावात आणण्यासाठी आ.राजुमामा भोळे यांचे काहीही योगदान नाही. त्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. भोईटेनगर, असोदा रेल्वे उड्डाणपूल मंजूर होते आमदारांनी आणलेले नाही. शिवाजीनगर उड्डाणपूल करणे आवश्यकच होते त्यासाठी चंद्रकांत दादांनी प्रयत्न केले होते त्यात आमदारांचा काही वाटा नाही, असेही बंटी जोशी म्हणाले.

आमदारांनी ७ वर्षात ७ टक्के तरी रस्ते केले का?

समांतर रस्त्यांसाठी मी १० वर्षापूर्वी सुरुवात केली त्यानंतर ते जन आंदोलन झाले. समांतर रस्त्यांचे काम आजही झालेले नाही. आमदारांना चौपदरीकरण आणि समांतर रस्ते यातील फरकच कळत नाही. आमदार सांगतात की, गेल्या ३५ वर्षापासून जळगावचे ६० टक्के रस्ते खराब आहेत, तुम्ही ७ वर्षांच्या आमदारकी काळात ७ टक्के तरी रस्ते केले का? मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री जळगाव मनपात लक्ष घालतात असे आमदार म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरचे नेते हैद्राबादला गल्लीबोळात मनपा निवडणुकीसाठी फिरत होते ते तिथे काय झिंगे पकडायला गेले होते का की बिर्याणी खायला गेले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तुम्ही पहाटे शपथ घेता ती युती कोणती?

२०१४ पासून आजपर्यंत भाजपने निवडणूक लढण्याशिवाय दुसरे धंदे केले नाही. त्यांनी फक्त हौसिंग सोसायटीच्या निवडणुका सोडल्या आहेत. तुमचे नेते पहाटे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शपथ घेता ती अभद्र युती नव्हती का? तुमचा खेळ टिकला नाही म्हणून तुम्ही अभद्र युती म्हणतात हे योग्य नाही. तुमच्या कर्तबगीरीला पाहून २७ लोक तुमच्याकडे आले नव्हते. नगररचना विभागाच्या कारभाराविरुद्ध मी आंदोलन केले तेव्हा आमदारांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला. सव्वा वर्ष तुमच्याकडे महापौर पद होते तेव्हा तुम्ही का बोलले नाही. अडीच वर्ष तुमच्या तोंडात लॉलीपॉप होते का? असेही ते म्हणाले.

पहा लाईव्ह व्हिडीओ :