जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२६ । जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आजपासून थेट ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनाची सेवा ठप्प झाली असून स्वच्छता व आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महापालिकेने शहरातील घनकचरा संकलनाचे काम बीव्हीजी (BVG) ग्रुप या कंत्राटदार कंपनीकडे सोपविले आहे. मात्र, दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला.

वेतन तातडीने मिळावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत घराघरातून कचरा संकलनाची सेवा ठप्प झाली असून नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचरा उचलला गेला नाही तर अस्वच्छता वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत थकीत वेतन आमच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.” त्यामुळे आता या प्रश्नावर जळगाव महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढून स्वच्छता सेवा पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.











