⁠ 
रविवार, मे 5, 2024

राज्यभरात कारवाई : अमळनेर एसटी आगारातील ४ कर्मचारी निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकार सेवेत विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नसल्याने एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी राज्यभरातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यात अमळनेरच्या ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळातच एसटीची चाके थांबल्याने अनेकांचे हाल होत आहे.

शासनाकडून ठोस निर्णय होणार नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. संप मागे घेतला जात नसल्याने अखेर शासनाने कारवाईचा मार्ग निवडला आहे. मंगळवारी राज्यभरातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले त्यात अमळनेर आगारातील ४, धुळे डेपोचे २, कळवण जि. नाशिक आगारातील १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.