जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । कोरोना निर्बंधामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. परंतु यंदा निर्बंध नसल्यामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. येणारे सगळे सण जल्लोषात, उत्साहात, आनंदात साजरे करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी सांगितले आहे. गेले दोन वर्षे असलेली निगेटिव्हिटीचे वातावरण बदल व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार बदलले आहे, तर सगळेच बदलायला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दहीसरमध्ये गणपती दर्शनाला गेले असताना मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दहीहंडीनंतर आता गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येतो आहे. यात पोलिसांनाही सांगितले आहे की सहकार्य जरा जास्तीचे असू द्या. ही आपली सस्कृंती, परंपरा आहे, ही आपल्याला पुढे वाढवायची आहे. जर आपण निर्बंध लादत गेलो तर हे उत्सव कमी होतील, त्यामुळे आम्ही हे उत्सव जोरात साजरे करण्यासाठी निर्बंध कमी केल्याचे मुखयमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांचे पैसेही माफ केले असेही त्यांनी सांगितले. येणारा नवरात्रोत्सव हाही जोरात साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मविआ सरकारवर टीका केली आहे. आपले आकाशाला हात कधीच टेकणार नाहीत, आपण जमिनीवरच आहोत असे सांगत टीका केली आहे. सरकार कुणाचं होतं आणि कोण चालवत होतं, हेही आपल्याला माहित असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गणराय या सगळ्यांना सद्बुद्धी येवो, अशी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. टीका करायची नाही, पण कामातून उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले आहे.












