⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

विरोधानंतर ‘अग्निपथ योजने’त सरकारने केला ‘हा’ मोठा बदल; लाखो तरुणांवर काय परिणाम होईल?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये लष्करी स्तरावर भरतीसाठी अग्निपथ योजना (Agneepath Yojana) सुरू झाल्यानंतर देशभरात त्याचा विरोध सुरू आहे. कुठे रस्ते अडवले जात आहेत तर कुठे रेल्वे जाळली जात आहे. आंदोलनानंतर दबावाखाली आलेल्या केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता या योजनेसाठी ही वयोमर्यादा २१ वरून ती २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. केवळ या पहिल्या भरतीसाठीच ही वयोमर्यादा शिथिल करण्याची सवलत असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सेवांमधील भरती थांबवण्यात आली होती. त्यामुळे तयारी करताना अनेक तरुण ओव्हरएज झाले. आता अशा तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांना वयात एकदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील.

वयात सवलत फक्त एकदाच उपलब्ध असेल
अग्निपथ योजनेंतर्गत वर्षभरात ९६ हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. यातील ४० हजार भरती लष्करासाठी आणि उर्वरित भरती हवाई दल आणि नौदलासाठी केली जाणार आहे. यातील पहिली भरती मेळावा पुढील ९० दिवसांत होणे अपेक्षित आहे. देशभरातील तरुण तिन्ही सैन्यात भरती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याची तयारी सुरू असतानाच अनेक तरुणांचे वयही उलटून गेल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे.

अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध
सरकारने अग्निपथ योजना सुरू करताच देशभरातील तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे. तरुणांचे म्हणणे आहे की, 4 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना अपात्र घोषित केल्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी लष्करातून काढून टाकले जाईल. त्यानंतर ते कुठे जाणार? आपले पैसे वाचवण्यासाठी सरकार आपल्या भविष्याशी खेळत असल्याचा संताप तरुणांमध्ये आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने रस्त्यावर उतरून या योजनेला विरोध करत आहेत.