जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळले. यात वाहन चालकासह एकूण २५ मजूर जखमी झाले असून त्यातील आठ जण गंभीर आहेत.

ही घटना आज बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ खुर्द शिवारात घडली. पिकअप (MH 20 EL 3384) वाहन अब्दुल्लापूर (तांडा, ता. पैठण) येथून २७ मोसंबी तोड मजुरांना घेऊन आडुळकडे निघाले होते. आडुळ खुर्द शिवारातील एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली घसरले आणि दोन लिंबाच्या झाडांवर आदळले.

घटनेतील जखमींना तातडीने आडुळ येथील पवार हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल आणि साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चिकलठाणा येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांवर संकट ओढवल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, तसेच आर्थिक मदतही द्यावी, अशी मागणी केली आहे.
अपघातातील जखमींची नावे?
जखमी झालेल्यांमध्ये अभय तुळशीराम चव्हाण (१८), सुमन कल्याण राठोड (२२), अमर तुळशीराम चव्हाण (१९), सुनिता अनिल चव्हाण (२७), छबाबाई ज्ञानू चव्हाण (५०), आरती अर्जुन चव्हाण (१५), पारुबाई ज्ञानेश्वर राठोड (२७), रेखाबाई बाबासाहेब चव्हाण (२५), उषा सुनील राठोड (३२), अविनाश प्रकाश चव्हाण (१६), द्रौपदाबाई रामनाथ चव्हाण (५०), सुरेश रणजीत राठोड (३०), सुनिता विनायक राठोड (३०), उषा लहू राठोड (४०) यांच्यासह अन्य मजुरांचा समावेश आहे.









