जळगाव लाईव्ह न्यूज । नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेतर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “NTA जवाब दो”, “पेपर माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अभाविपने नेशनल नेशनल टेस्टिंग एजेंसीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

अभाविपने स्पष्ट केले की, २०२४ मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेमध्ये अनियमितता होणे अत्यंत दुर्दैवी व निराशाजनक आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेची तयारी करत असताना अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. पेपर लीक व परीक्षा घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी संयम राखावा, अफवांवर विश्वास ठेवू नये. अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ठामपणे लढत राहील.”
अभाविप जळगाव महानगर मंत्री वरद पांढारकर यांनी सांगितले की, “नीट परीक्षा व्यवस्थेतील वारंवार समोर येणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे,जळगांव महानगर सहमंत्री वरद पांढारकर, ललित सोनार, गणेश दुसाने, मोहित सोनी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.











