⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Yawal : लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू रोख रक्कमेसह दागिने घेऊन झाली फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । बऱ्याच ठिकाणी मुलांना मुलगी मिळत नसल्याने पैसे देऊन लग्न लावले जात आहे. मात्र त्यातही लग्नाच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटना वाढतच चालल्यात. असचा एक धक्कादायक प्रकार यावलमध्ये घडला आहे. तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक करून नवरी पसार झालीय. या प्रकरणात दाखल गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
शहरातील वाणी गल्लीतील रहिवासी चित्तरंजन जयप्रकाश गर्गे या तरूणाचे बुऱ्हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले यांनी शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे (पाटील) या महिलेस बबलू गर्गे यांचे साठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले. शीला अनर्थे यांनी दोन्ही पक्षाकडील पाहणीनंतर नाशिक येथील माया संजय जोशी हिचेशी ३१ जानेवारी रोजी बुऱ्हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला होता.

फेब्रुवारी रोजी येथील फालक नगरातील ब्युटी पार्लर मध्ये नववधूस पती बबलू गर्गे यांनी सोडल्यानंतर पार्लरमध्ये वेळ लागणार असल्याने गर्गे घरी निघून गेले. पुन्हा एक तासाने नववधूस घेण्यासाठी आले, असता नववधूने पार्लर मधून पलायन केले. लग्न ठरविण्यासाठी गर्गे यांनी दिलेले २ लाख रुपयांसह घरातील कपाटातील ५० हजार रुपयाची रोकड व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज पोबारा केला.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व महिला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे आणी सिमा चिखलकर, पोलीस कर्मचारी एजाज गवळी यांच्या पथकाने या फसवणुकीच्या गुन्ह्यतील संशयीत आरोपी अशोक सुधाकर जरीवाले राहणार बऱ्हाणपूर ( मध्य प्रदेश ) , शीला बाळू सोनवणे उर्फ शीला साईनाथ अनर्थे पाटील राहणार कोपरगाव, प्रकाश साहेबराव साळुंखे उर्फ प्रकाश संजय जोशी शारदा प्रकाश साळुंखे राहणार इंदौर ( मध्य प्रदेश ) यांना अटक केल्यानंतर सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी यातील अटकेत असलेल्या तिन संशयित आरोपींना यावल येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचा, न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी आदेश दिला आहे.