⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचं धक्कादायक पाऊल, वृद्ध आईवडिलांना बसला धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । यावल तालुक्यातील दोणगाव येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आलीय. बळीराम अरूण पाटील (वय-३७) असं मृत तरुणाचे नाव असून लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचं बोलले जात आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बळीराम पाटील हा आईवडीलांसह दोनगाव येथे वास्तव्याला असून त्याने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. लग्न होत नाही या नैराश्येतून तरूणाने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे.

बळीराम हा अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केली. याबाबत विवेक धनराज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान व पोलीस करीत आहे.