जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत विविध विभागांना सूचना दिल्या यामध्ये पोलीस, आरोग्य, अन्न औषध व शिक्षण विभागाने कोटपा- २००३ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कलम ५ व कलम ७ अंतर्गत मासिक किमान १० कारवाई करण्यात याव्यात. शाळेच्या १०० यार्ड परिसरात असणाऱ्या पान टपरी, तंबाखू तथा तंबाखू विक्री केंद्रावर करवाई करून त्यांना तिथून हटविण्यात यावे. जीएसटी विभागामार्फत तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा मासिक अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा.
तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे नशामुक्तीसाठी समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची नोंदणी वाढविण्यात यावी. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथील दैनंदिन तसेच मासिक रुग्णसंख्या वाढवावी व जास्तीत जास्त उपचार देण्यात यावेत. मौखिक आरोग्य तसेच मुख कर्करोग प्रतिबंध विषयावर जनजागृतीपर संदेश तयार करून सोशल मिडिया द्वारे प्रसारित करण्यात यावेत. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील नागरिकांनी तंबाखूचे सेवन थांबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. जिल्हा प्रशासन जनजागृती उपक्रम राबवित आहे. पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलीस दलाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा तंबाखूमुक्तीसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.