⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महालखेडा शिवारात शेतात बांधलेला बैल बिबट्याच्या हल्ल्यात ठार!

जळगाव लाईव्ह न्यूज । |सुभाष धाडे | जिल्ह्यातील नव्याने घोषित झालेल्या ‘मुक्ताई-भवानी अभयारण्यातर्गत’ येणाऱ्या चारठाणा वनपरीक्षेत्रातील मौजे टाकळी येथील शेतकरी यांचा बैल बिबट्याच्या हल्ल्यात ठार झल्याची घटना सकाळच्या सुमारास उजेडात आली.


शेतकरी रामदास शालीग्राम कायटे रा.टाकळी यांचे शेजारील महालखेडा शिवारातील शेतात बिबट्याने बैलावर हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली.यामुळे शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.तत्पुर्वी याच महिन्यात दि ५ फेब्रुवारी रोजी नांदवेल शिवारात वास्तव्यास असलेला बिबट्या वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता.यामुळे शेतकरी वर्गात भयभीयता वाढली होती.अशातच आता टाकळी,महालखेडा शेती- शिवारात अनेकांना पाऊलखुणा आढळुन आल्याने तसेच आज सकाळी बैल ठार झाल्याची घटनेने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग धास्तावलेला आहे.


दरम्यान वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डि जी पाचपांडे,वनरक्षक धोंडीबा पवार,वनमजुर देवानंद ठाकरे,इंगळे,टाकरखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असुन बैलाची शिकार करणारा नेमका हिस्र पशु कोणता? यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कुऱ्हा वनपरीमंडळातील थेरोळा शिवारातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन काही शेतकऱ्यांना घडले होते. यावरुन असे लक्षात येते कि,वडोदा वनक्षेत्रातर्गत असणाऱ्या पुर्णाकाठ शेतीशिवारात हिस्र पशुंची संख्या एकापेक्षा अधिक असुन संबधित क्षेत्रात बिबट्यांची संख्या निर्धारीत करावी व अन्य अतिरीक्त हिस्र पशुंना इतरत्र ठिकाणी हलविण्यात यावे अशी मागणी काही शेतकरी बांधवांकडुन होत आहे.