⁠ 
शनिवार, मे 18, 2024

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध ; काय आहेत घोषणा एकदा वाचाच..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न केला असून या जाहीरनाम्यात कृषी, वीज, उद्योग अशा विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे नेते जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपस्थित होते. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अजित पवार यांनी केलेल्या भाषणात सांगितले की, ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी यासंकल्पनेवर आधारीत हा जाहिरनामा आहे. सर्व समाजाला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा, जातनिहाय जनगणना असे अनेक वैशिष्ट या जाहीरनाम्यात आहेत.’ आम्ही महायुतीत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. सबका साथ सबका विकास यावर राष्ट्रवादीचा विश्वास आहे.’, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील घोषणा..
स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी हे आमचे ब्रीद आहे. किमान आधार मूल्य हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्याची जपवणूक करू.
शेती उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रत्रानाला चालना आणि सामूहिक शेतीला प्रोत्साहन देऊ.
सकस आहार, सशक्त नागरिक यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देऊ.
विकसित भारताच्या प्रगतीचा महाराष्ट्र हा मुख्य स्रोत राहील यासाठी राष्ट्रवादी पक्ष कटीबद्ध आहे.
राज्यात देशी आणि परदेशी गुंतवणुकीला चालना देऊन हाताला काम आणि प्रत्येक परिवाराला दाम हा आमचा संकल्प आहे.
मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या १० लाखांच्या कर्जात १० लाखांची वाढ करून ते २० लाखांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करणार.
महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहणार.

शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन होस्टेलची उभारणी करणार.
युवकांना रोजगाराची हमी हा आमचा शब्द आहे.
युवकांना शिक्षणाची समान संधी लाभेल यासाठी प्रयत्नशील राहणार.
७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार.
जातनिहाय जनगणना व्हावी असा आमचा आग्रह राहिल.
उर्दू माध्यमांच्या शाळांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेमी इंग्रजी शाळांचा दर्जा बहाल करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर प्रधानमंत्री शेत-शिवार-पाणंद रस्ता या नव्या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही भूमिका बजावेल.
आमच्या मराठी या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील असून तो मिळवणे हा मराठी मनाचा आणि मराठी जणांचा अधिकार व हक्क आहे.
यशवंतराव चव्हाणसाहेबांना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोलाची भूमिका बजावेल.
भारत जगाला युद्धाचा नव्हे तर बुद्धांच्या शांतीचा संदेश देणारा देश आहे. “वसुधैव कुटुंबकम” हा आमचा आत्मा आहे. भारत जगात मानवतावाद आणि बंधूभाव नांदेल असे संबंध जोपासत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे.
भारताने जागतिक दहशतवादाच्या विरोधात कायम ठोस भूमिका घेतली आहे. भारताला दहशतवादाची झळ बसलेली असतानाही आपल्या शेजारी देशांचा आदर आणि सन्मान राखत भारत कायमच मैत्रीपूर्ण संबंध राखण्यात यशस्वी झाला आहे.
केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देत आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे