⁠ 
बुधवार, मे 22, 2024

पावसाअभावी पिके धोक्यात? राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? IMD दिली महत्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । ‘जुलैमध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसला. ऑगस्टमध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला. गेल्या २० दिवसांमध्ये राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही. मागील काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला. मात्र पुन्हा पावसाने उघडीप दिली असून उभी पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्टच्या उर्वरित दिवसांमध्ये पाऊस नसून सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

हवामाने विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव पाहयला मिळेल. त्याचा परिणाम सप्टेंबरमध्ये काय होईल, हे पाहावं लागेल. तसेच राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ‘जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला. पुढील १० दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पेरण्या जूनच्या अखेरीस झाल्या. कारण जूनमध्ये अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. अनेक शेतकऱ्यांची पिके वर आली आहेत. मात्र, पिकांना पाणी मिळत नाहीये. या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आवाहन आहे की, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस असण्याची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची स्वत:हून शेततळे किंवा इतर माध्यमातून नियोजन करावं’.गेल्या २० दिवसांमध्ये राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही. विदर्भ आणि कोकणात चांगला अर्थात सरासरी पाऊस आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘राज्यात सात टक्के तुटीचा पाऊस. त्याचबरोबर पुढील दहा दिवस पावसाचे कोणत्याही प्रकारचे तीव्र इशारे नाहीत. पुढील आठ-दहा दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या काळात पावसाची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी उभी पिके करपू लागली आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यासह राज्यातील एकही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना आधार मिळाला. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहे. मात्र शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे.