⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

पाऊस परतल्याने शेतकरी खुश! हवामान खात्याकडून आज जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२३ । अनेक दिवसापासून रजेवर गेलेला पाऊस राज्यात पुन्हा परतला आहे. उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरात बदल झाले आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मागील दोन दिवसापासून राज्यातील जळगाव जिल्ह्यासह काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. आज रविवारी राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, राज्यासह जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने विश्रांती घेतली. मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके करपू लागली होती. मात्र मागील दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील काही भागात पावसाने पावसाची हजेरी लावली.

जिल्ह्यात शुक्रवारनंतर शनिवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु होती. आज रविवारी देखील सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालीय. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांना या पावसाचा फायदा होतोय.

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.