महाराष्ट्रावर पाऊस रुसला, शेतकरी चिंतातूर ; आता हवामान विभागाकडून आली मोठी अपडेट

ऑगस्ट 12, 2023 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । जुलैत धुमाकूळ घातलेला पावसाने आता दडी मारली आहे. महाराष्ट्रावर गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस रुसून बसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. भर पावसाच्या मोसमात आता सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचं धस्स झालंय. एकीकडे पिके डुलायला लागली असता त्यात पाऊस गायब झाला असून ही पीकं पुन्हा कोमेजून जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला असून पावसाची वाट पाहत आहे. यातच आता हवामान विभागाकडून सर्वात मोठी अपडेट समोर आलीय.

mansoon rain jpg webp

खरं म्हणजे ही अपडेट निराशा करणारीच आहे. पण राज्यात आता पाऊस कधी येऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यासाठी पुढचे दोन आठवडे जास्त आव्हानात्मक असणार आहेत. कारण दोन आठवडे पावसाची शक्यता फार कमी आहे.

नेमका काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास सध्या फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. 19 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सध्या सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे.

17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. राज्यात या काळात सर्वदूर मोसमी पाऊस विश्रांती घेईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढून 18 किंवा 19 ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 25 ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर पावसाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड येथे पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतका, किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now