⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कृषी मंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | राज्यभरात गारपीट व अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच प्रकारे जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतावर भेट दिली. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर शेतकरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्हा दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती तात्काळ मदत न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

एरंडोल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती अमोल पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी बरेच शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित आहेत, तसेच गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे. हे नुकसान कुठेही एका विशिष्ट भागात नाही तर सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे व्हावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. यावेळी मागणीची दखल घेत, शासन अतितातडीची मदत जाहीर करण्यासाठी सकारात्मक असुन एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहु नये असे आदेश मंत्री अब्दुल सत्तर यांनी उपस्थित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना दिले.