जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याचे आज अनिल गुजर प्रणित संघटनेने जाहीर केले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे. दरम्यान, अद्यापही इतर संघटना संपावर ठाम असल्याने पुन्हा एसटी कर्मचारी संघटनेत उभी फूट पडल्याचे दिसून येते.
आज परिवहन मंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाली. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी आपण संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. ‘आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. न्यायालयाने मुदत दिली असल्याने संपातून माघार घेत असल्याचे ते म्हणाले.
गुजर म्हणाले की, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. २२ डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे’, असं अजय गुजर यांनी सांगितलं. दरम्यान, अजय गुजर यांची ही घोषणा महत्वाची आहे. कारण, अजय गुजर प्रणित महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं ही संपाची नोटीस दिली होती.
संपकरी कर्मचारी मागणीवर ठाम
आझाद मैदान आणि राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याबाबत विचारलं असता गुजर म्हणाले, कर्मचारी भावनावश होत आहेत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाहीत, पैसे कुणी जमा केले हे आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये आणि ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यात कोणतीही फूट पडलेली नाही, असं अजय गुजर यांनी सांगितलं. तसंच आता चर्चा करायची नाही. आम्ही संप पुकारला होता तो आम्ही मागे घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
- दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला चोरटा जाळ्यात; चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात
- गया ते मुंबई दरम्यान धावणार नवीन एक्स्प्रेस; जळगाव, भुसावळात असेल थांबा
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात नाभीतून आतडे बाहेर आलेल्या शिशुवर यशस्वी उपचार
- यावल तालुक्यातील महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र घोषित; कारण काय?