समस्यांनी नशिराबादकर हैराण; नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासकाची मागणी

ऑक्टोबर 5, 2021 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । जळगाव तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासक नसल्याने गावातील समस्या सोडविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Untitled design 2021 10 05T162040.264 jpg webp

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये झाले आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहेत. पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील वार्डांमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. गटारींची अस्वच्छता वाढत आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहेत. बसस्थानक चौकातील हायमस्ट लॅम्पसह गावात पथदीवे बंद आहेत. पावसाळ्यात सहाव्या-सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे. नियोजना अभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. त्यामुळे मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्णवेळ प्रशासक मिळावा व समस्या त्वरित सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन दि.५ ऑक्टोबर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्राध्यापक विश्वनाथ महाजन यांनी गावातील विविध समस्यांवर उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली.

निवेदन देतेवेळी स्वयम् शोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे, सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बारूदवाले, सागर मोरे आदी उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now